देणे न घेणे

निसर्गात पाऊस येता मनाने
भुईतून डोकावली चार पाने
हवेतून डोले यशाचेच गाणे
निसर्गास काहीच देणे न घेणे

कवी : रोहन जे । वृत्त : भुजंगप्रयात । लेखन : नोव्हेंबर २०२४

भावार्थ – या विश्वात निसर्ग हा व्यापक स्तरावरून आपल्या मनाने कार्यरत आहे. कधी, कुठे पाऊस पडावा? हे सारे निसर्गावर अवलंबून आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर आपसूकच आसपास सर्वत्र हिरवा निसर्ग बहरून येतो. भुईतून उगवलेल्या रोपाची चार पानेही अशीच आपली उमलून बाहेर डोकावू लागतात, आणि जणू काही आपणच आपले बहरलो आहोत या यशाच्या हवेत डोलू लागतात, यशाचे गाणे गाऊ लागतात. निसर्गाचे मात्र त्याकडे यत्किंचितही लक्ष नसते, तो आपल्या चलनाने चलित असतो. त्याचे कशाशीच देणे-घेणे नसते. थोडक्यात, आपल्या आयुष्यातील यश हे केवळ व्यापक स्तरावरून मिळालेल्या गतीने शक्य होते, त्यात हुरळून वा रमून जाण्याकरिता आपले असे स्वत:चे काही नसते.

देणे न घेणे
देणे न घेणे